![](https://sayanupdate.com/wp-content/uploads/2023/11/IMG_20231111_205107_1000_x_750_pixel.jpg)
□ अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावांमधील भरड धान्य उत्पादन करणाऱ्या महिलांनी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेल्याने अजित पवारांचा निषेध नोंदवला आहे. येत्या नागपूर अधिवेशनामध्ये सोलापूरचा प्रकल्प सोलापुरात न आल्यास अधिवेशनासमोर हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
तृणधान्य मूल्य साखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था हैदराबाद यांच्यामध्ये सामंजस्य करार करून सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय 9 मार्च 2022 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झाला होता.
सोलापुरात होणाऱ्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र बाहेर जात असल्यामुळे राजकारण तापले आहे. सुमारे 200 कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प बारामतीला पळवल्याचा आरोप अजित पवारांवर केला जात आहे.
सोलापुरातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार खोटे बोलत असल्याचा दावा केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील महिला शेतकरी उत्पादकांनी अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने केली. भरड धान्याची प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्याला मंजूर झालेल्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलवण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. हा प्रकल्प तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्याला मंजूर केला होता. मात्र, अजित पवार यांनी वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सात महिन्यातच हा प्रकल्प बारामतीकडे घेऊन गेल्याचा आरोप होत आहे. यातच शरद पवार गटाने शासनाचा जीआर दाखवत अजित पवार खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. एकतर राज्य शासनाचे परिपत्रक खरे आहे का? अजित पवार खोटे बोलत आहेत असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशांत बाबर यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने झाले आहेत.